Thursday, 22 December 2016

"सावित्रीचा प्रकोप"


 

          त्या अमावस्येच्या किर्रर्र रात्री मोबाईल फोन खणखणला. पोलीस ठाण्यातून फोन होता. महाड हायवे वरचा पूल वाहून गेला दोन एसटी बस सावित्री नदीत पडल्या असून आपल्याला तात्काळ बंदोबस्ताला रवाना व्हायचं आहे." फोन वरील पोलीस कर्मचाऱ्यान कळवल. घटनेच गांभीर्य ओळखून पावसात भिजत आम्ही खाजगी मोटार सायकलने तात्काळ बंदोबस्ताला रवाना झालो. घटनास्थळी पोहचताच निसर्गाच ते महारुद्र भयावह स्वरूप पाहिलं. दुथडी भरून वाहणारी फेसाळती सावित्री नदी भलतीच खवळलेली भासत होती. कल्पना केल्या पलीकडे प्रकरण जास्तच गंभीर होत. ब्रिटीश कालीन बांधकाम असलेला पूल मधोमध तुटून वाहून गेला होता. डोळ्यांवर विश्वास न बसण्यासारख थरकाप उडवणार भयाण चित्र दिसत होत. प्रत्यक्षदर्शिंच्या मते दोन एसटी बस आणि काही लहान वाहन देखील वाहून गेली होती.

          रात्रीच्या किर्रर्र काळोखात तुफान बरसणाऱ्या पावसात पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला हजर झाले. घटना मिडिया वर दिसू लागल्याने लोकांची गर्दी वाढू लागली. लोक पोलिसांना न जुमानता पुलावर आणि नदी किनाऱ्यावर जाऊ लागले. रस्त्यात अनावश्यक वाहनांची कोंडी होऊ लागली. वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर गर्दी हटवण्यासाठी नेमण्यात आले. चिखलात, पाण्या पावसात, जिथे २ मिनिट विश्रांतीसाठी देखील बसता येणार नाही अश्या ठिकाणी पोलीस कर्मचारी खडा पहारा देऊन लोकांची गर्दी थांबवू लागले. १२ तासाहून जास्त वेळ आमची ही दमछाक सुरुच होती. 

          गर्दीतील बरेचजण झाल्या घटनेला पोलिसच जबाबदार असल्या सारख आम्हाला शिव्या-शाप देत होते. दिवस उजाडताच एन.डी.आर.एफ.टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या जवळच्या साधन सामुग्रीच्या माध्यमातून स्वताचा जिव धोक्यात घालून ते जवान त्या तुफानी नदी प्रवाहात स्वताला झोकून देत होते. 

          नदीप्रवाहावर हेलिकॉप्टर देखरेख करीत होत. घटनेच कव्हरेज चित्रण करायला अनेक न्यूज च्यानेलचे क्यामेरे लागले होते. त्यातील कित्त्येक उद्दाम न्यूज रिपोर्टर तर पोलिसांना अगदी कुत्र्याची वागणूक देऊन स्वताच्या मनाला वाटेल त्या मोक्याच्या जागा घेऊन चित्रीकरण करू लागले होते. बर.. काही बोलाव तर उगाच विषय चिघळवळायला त्यांच्या बापच काय जातय?.

         त्या खवळत्या प्रवाहाच्या पाण्यात सलग ४-५ तास शोध मोहीम राबवुन विश्रांतीसाठी किनाऱ्यावर येऊ पाहणाऱ्या एन.डी.आर.एफ. जवानांना  किनाऱ्यावर येऊ न देताच हे रिपोर्टर निर्लज्जपणे त्यांच्यावर आपल्या प्रश्न्नाचा भडीमार करीत होते. कित्तेक रिपोर्टर तर टी.आर.पि निमित्त लाईव्ह शोध मोहीम दाखविण्यासाठी एन.डी.आर.एफ.च्या बोटीत बसून चित्रीकरण करण्याचा हटट करीत होते. तो हटट त्यांनी पुरा केला सुद्धा म्हणा.! 

          घटनास्थळाला राज्याचे अनेक ज्येष्ठ अन् श्रेष्ठ नेते भेट देऊ लागले होते. पोलिसांना एकाचवेळी दोन्ही महत्वाचे बंदोबस्त करावे लागत होते. काही स्थानिक लोक जात, धर्म बाजूला सारून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पाण्यात सापडणारी मृत शव पाण्याबाहेर काढून शववाहिनी पर्यंत पोहचविण्यात मदत करीत होते. बंदोबस्ताला असलेल्या नवीन भरती झालेल्या पोलीस जवानांची स्थिती तर अतिशय केविलवाणी अन् दयनीय झाली होती. काहीलोक आणि न्यूज रिपोर्टर एकत्र मिळून घटनेच गांभीर्य सोडून त्यां जवानाचीच खिल्ली उडविण्यात मग्न होते. मृतांचे मिळणारे शव प्रथम आपल्याच च्यानेलवर दिसावं यासाठी त्यांची धडपड सुरु होती. लोकांच्या हातातील मोबाईल मृतांप्रतीच्या बेगडी भावना स्पष्ट करीत होते. मृत शरीर पाण्याबाहेर काढण्यापूर्वी त्यांना छायाचित्र काढून घेण्याची गरज जास्त वाटत होती.

        इकडे नियंत्रण कक्षात मृतांच्या नातेवाईकांची तौबा गर्दी उसळली होती. प्रत्यक्ष पोलीस नियंत्रण कक्षातील माहिती आणि व्हाटस् अप वर फिरणारे छायाचित्र , अफवा तसेच मीडियावर झळकणारे मृतांचे आकडे यात कमालीची तफावत दिसून येऊ लागली. लोक मोबाईल आणि टीव्हीवर येणाऱ्या माहितीवरून पोलीस अधिकाऱ्यांना खोदुन खोदुन माहिती विचारीत होते. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची पुरती दमछाक होत होती. अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत आवाहन करताच मृतांचे नातेवाईक संतापुन अधून मधून अधिकाऱ्यांनाच शिव्या देऊ लागले होते. प्रत्येकाला आपल्या नातेवाईकांची काहीना काही माहिती हवीच होती. 

      तिकडे सरकारी दवाखान्यात पोलिसांची एक टीम नदी पत्रात मिळून येणाऱ्या मृतांच्या शरीरावर पोस्टमार्टेम करण्यासाठी आवश्यक कागदोपत्री कार्यवाही करण्यात गुंतली होती. तहान भूक विसरून सर्व पोलीस यंत्रणा झटून कामाला लागली होती. अनेक महाभाग दवाखान्यात गर्दी करून पोलिसांना पंचनाम्यात सुद्धा अडथळे निर्माण करीत होते. कुणी राजकीय नेते सरकार वर टीका करण्यात मग्न होते तर काही सेवाभावी संस्थाचे स्वयंसेवक मृतांच्या नातेवाईकांना जेवण पाण्याची सोय करून देवून मानवतेच दर्शन घडवून देत होते.

         निसर्गाच्या या प्रकोपाला आज माझ्या कोकणचा निर्दोष सामान्य माणूस बळी पडला होता. या घटनेचा कोणी सोहळा म्हणून चवीने चित्रीकरण करीत होत तर कुणी संधीसाधू सोशल मीडियाचा वापर करून अफवांच बीज परत होत. कुणी राजकीय पोळ्या भाजत होत तर कुणी पोकळ आश्वासन देत होत..कुणाचे हात प्रत्यक्ष मदतीसाठी साथ देत होते तर कुणाचे हात मोबाईलने छायाचित्र काढण्यात मग्न होते. कुणी जात धर्म बाजूला सारून घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना अन्न पाणी निवारा देत होते तर कुणी महभाग फुकटात मिळणार फूड पाकीट गाडीच्या डिक्कीत लपवण्यात गुंग होते. कुणी पोलीस आणि प्रशासनाला नाव ठेवण्यात धन्यता मानत होत तर कुणी प्रशासनाला मनापासून मदत करण्यात गुंतल होत. .......
         काहीही असो पण या भयाण आणि छातीत धडकी भरविनाऱ्या प्रसंगात माणसाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच दर्शन मात्र सहज घडत होत.!!!
     .....
     .....
     मन्या ठाकूर

No comments:

Post a Comment