त्या वेळी ट्रेनिंग निमित्त सोलापुरात
होतो. २००९ च्या लोकसभा निवडणूकी करिता आमची संपूर्ण ब्याच सोलापूरहून सांगलीतल्या
शिराळा तालुक्याला धाडण्यात आली होत. मी मतपेटी वाटप केंद्रावर हजर झालो. मला
शेंडगेवाडी म्हणून कुठल्याश्या धनगरवाडीवरच्या मतदान केंद्रावर ड्युटी नेमलेली
होती. सोबतचा स्टाफ जमला. सगळा जेन्ट्सच भरणा होता. कागदपत्रांची छाननी झाली.
आमच्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी साधारण ११ वाजता
आम्ही शेंडगेवाडीकडे प्रवास सुरु केला.
आम्ही
प्रवास करीत असलेली सुमो तशी उतारवयालाच आलेली होती. खडबड खडबड करीत आम्ही आर्धा
अधिक रस्ता पार केला होता. दुपारच जेवण रस्त्यालाच कुठल्याश्या धाब्यावर झाल. हे शेंडगेवाडी
भलतच लांब अन उंच डोंगरावर असल्याच ड्रायव्हरने आधीच सांगून ठेवल होत. वाडीवर
जायला कच्चा गाडरस्ता होता त्याच रस्त्यान त्यान त्याची म्हातारी गाडी बिनधास्त
घातली. मागे धुरळा उडवीत गाडी डोंगर चढू लागली तोच गाडीसमोरून रस्त्यालगतच्या
झुडुपातून कुठलस एक माजलेल भयंकर धूड धावत गेल. “”लांडग बगा” म्हणत ड्रायव्हरने
गाडीला ब्रेक केला. लागलीच त्या लांडग्याच्या मागून आणखी ५-६ लांडगे धावत निघून
गेले. लांडग्याशी ती पहिली भेट.
वाडीवर
पोहचायला सायंकाळचे साडेपाच सहा वाजले असावे. दुसऱ्यादिवशी पुन्हा आम्हाला घेवून
जायचं असल्याने गाडीवाल्यान सुध्दा आमच्या सोबत वाडीवरच वस्ती करण्याचा बेत केला.
वाडीवर जाताच आम्ही प्राथमिक शाळेचा शोध घेतला. लहान लहान झोपड्या असलेल्या त्या वाडीवरच्या
वस्तीपासून जवळच एक कौलारू जुनाट बांधकाम दिसल. ती शाळा असल्याच भिंतीवरच्या
चित्रावरून दिसत होत. आत शिरताच शाळेत बरेच दिवस कुणी टोकवल नसल्याच स्पष्ट जाणवल.
शाळेला लादी नव्हतीच जमिनीला पोपड्या सुटलेल्या होत्या. उंदीर घुंशीनी मोठ मोठे
बंगले थाटलेले दिसत होते. छप्परावर कौल असून नसल्यासारखी होती. आता इथेच मतदान
केंद्र उभारायचं म्हंटल्यावर स्टाफने साफसफाई सुरु केली. ह्यांडपंपावरून पाणी आणून
आतली जमीन भिजवून घेतली. .
वाडी म्हणजे हॉटेल धाबा नाहीच रात्रीच्या
जेवणाची सोय व्हावी म्हणून वाडीवरच्या २-४ पोरांना हाताशी धरल. पोरांनी आपापल्या
परीने घरोघरी शिजवलेल्या दोन दोन नाचणीच्या भाकऱ्या आणल्या होत्या. सोबत कांदा आणि
लसून मिरचीचा ठेचा. कुणीतरी भरलेली वांगी आणली होती. सगळ मोफत बर का.! पोटभर खावून
झाल होत. पण आता रात्री शाळेत झोपण शक्य नव्हतच. १-२ विंचू सुध्दा मारले होते की
साफसफाईच्या वेळी. त्यात पोरांनी अजून एक भीती घातली इथे रात्री लांडगे येतात
म्हणे. अर्थात त्यातून मार्ग सुध्दा त्यांनीच काढला.
रात्री
आमच सगळ समान घेवून आम्ही वाडीवर गेलो. तिथल्या एका मोठ्ठ्या पटांगणात भलमोठ कुंपण
केलेलं होत. आत बऱ्याचश्या बकऱ्या अन मेंढर होती. अख्या वस्तीची मेंढर एकत्रच ठेवायची
हि लोक. अधेमधे बाजली टाकलेली होती. सगळी तरणी पोर त्या कुंपणातच झोपायची
मेंढरांची राखण करायला. आज हा योग आमच्यासाठी जुळून आला होता. लाकडी बाजल्यावर
पडून त्या चांदण्या रात्रीत, गार वाऱ्याच्या झुळुकी अंगावर घेताना कुंपणातल्या मेंढ्या-बकऱ्यांच्या
मुत्राच्या वास कुठेतरी दूर पळून गेला होता. रात्रभर वाडीवरच्या धनगर पोरांशी
राजकारण अन वाडीचा विकास यावरच्या गप्पा मारण्यात झोप कधी लागली ते कळलच नाही.
गाढ
झोपेत असताना अचानक वाडीवरची सगळी कुत्री भूकायला लागली. भूकता भूकता कुत्र्यांनी
मेंढर असलेल्या कुंपणाभोवती त्याचं सुरक्षा कड तयार केल. सगळी पोर काठ्या, भाले
घेऊन सज्ज झाली. “वाडीजवळ लांडगी आल्यात” “आलो लगी हुसकावून”! म्हणत काही पोर
काळोखात कुठतरी धावत गेली. त्यांच्या सोबत बरीचशी कुत्री सुद्धा धावत सुटली. अन
थोड्याच वेळात सगळी पोर पुन्हा कुंपणात परतली. आमच्या मात्र अंगावरचा काटा जाता
जाईना.
दुसऱ्या
दिवशी सकाळी सकाळी कोंबड आरवताच वाडीवरून बकरीच्या दुधाचा चहा, आणि कांदापोहे असा
छान नाश्ता मिळाला. मतदान व्यवस्थित सुरु होत. मतदानाला साठी-सत्तरीची म्हातारी
मंडळी अन विशी-पंचविशीची तरणी पोर एवढीच.! ४०-५० वयोगटातली सगळी मंडळी मेंढर घेवून
कोकणात गेली होती. वाडीवर वीज होती. आत्ता पर्यंत वाडीवर सरकारी योजनेतून काही
घरकुल आणि एक ह्यांडपंप या पलीकडे विकास म्हणण्या इतपत वेगळ काही नव घडलेलं दिसत
नव्हत. “”निवडनुका आल्या का फुढारी मंडळी वाडीवर येत्यात आन ह्यांव करू त्यांव करू
सांगत्यात” “कोन काय करीत नसतय बगा” हीच ओरड प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडत होती.
दुपारी
मस्त पैकी गावरान कोंबड्याची मेजवानी उडवून आम्ही तृप्त झालो होतो. सायंकाळी मतदान
संपल. जाता जाता आम्ही सर्वांनी मिळून काही पैसे जमा केले आणि आमची चोख व्यवस्था करणाऱ्या
त्या पोरांना देऊ केले. पण अस्सल धनगरी गावठी मन ते त्यांनी ते पैसे घेतली नाही. “”सायेब
तुमी आमच पाव्हन”’ “”तस बी आमच्या वाडीकड कुणी टोकवत न्हाई निवडनुकीमूळ का होईना
तुमच्या सारख्याला आमच आयुक्ष आन हाल बगाय मिळत्यात” “ह्यो आमचा पाहुनचार”! त्याच्या
धनगरी ठेक्यात त्यान त्याच मन मोकळ केल. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो. सोबत
होता परिस्थितीने कफल्लक पण मनाने श्रीमंत असलेल्या लोकांच्या सहवासाचा अनुभव. अन शेंडगेवाडी
वरच्या पाहुणचाराची बहुमोल शिदोरी.!!
...
...
मन्या ठाकूर