Thursday, 29 December 2016

“”धनगरवाडीवरचा पाहुणचार””



त्या वेळी ट्रेनिंग निमित्त सोलापुरात होतो. २००९ च्या लोकसभा निवडणूकी करिता आमची संपूर्ण ब्याच सोलापूरहून सांगलीतल्या शिराळा तालुक्याला धाडण्यात आली होत. मी मतपेटी वाटप केंद्रावर हजर झालो. मला शेंडगेवाडी म्हणून कुठल्याश्या धनगरवाडीवरच्या मतदान केंद्रावर ड्युटी नेमलेली होती. सोबतचा स्टाफ जमला. सगळा जेन्ट्सच भरणा होता. कागदपत्रांची छाननी झाली. आमच्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी साधारण ११ वाजता आम्ही शेंडगेवाडीकडे प्रवास सुरु केला.
      आम्ही प्रवास करीत असलेली सुमो तशी उतारवयालाच आलेली होती. खडबड खडबड करीत आम्ही आर्धा अधिक रस्ता पार केला होता. दुपारच जेवण रस्त्यालाच कुठल्याश्या धाब्यावर झाल. हे शेंडगेवाडी भलतच लांब अन उंच डोंगरावर असल्याच ड्रायव्हरने आधीच सांगून ठेवल होत. वाडीवर जायला कच्चा गाडरस्ता होता त्याच रस्त्यान त्यान त्याची म्हातारी गाडी बिनधास्त घातली. मागे धुरळा उडवीत गाडी डोंगर चढू लागली तोच गाडीसमोरून रस्त्यालगतच्या झुडुपातून कुठलस एक माजलेल भयंकर धूड धावत गेल. “”लांडग बगा” म्हणत ड्रायव्हरने गाडीला ब्रेक केला. लागलीच त्या लांडग्याच्या मागून आणखी ५-६ लांडगे धावत निघून गेले. लांडग्याशी ती पहिली भेट.
      वाडीवर पोहचायला सायंकाळचे साडेपाच सहा वाजले असावे. दुसऱ्यादिवशी पुन्हा आम्हाला घेवून जायचं असल्याने गाडीवाल्यान सुध्दा आमच्या सोबत वाडीवरच वस्ती करण्याचा बेत केला. वाडीवर जाताच आम्ही प्राथमिक शाळेचा शोध घेतला. लहान लहान झोपड्या असलेल्या त्या वाडीवरच्या वस्तीपासून जवळच एक कौलारू जुनाट बांधकाम दिसल. ती शाळा असल्याच भिंतीवरच्या चित्रावरून दिसत होत. आत शिरताच शाळेत बरेच दिवस कुणी टोकवल नसल्याच स्पष्ट जाणवल. शाळेला लादी नव्हतीच जमिनीला पोपड्या सुटलेल्या होत्या. उंदीर घुंशीनी मोठ मोठे बंगले थाटलेले दिसत होते. छप्परावर कौल असून नसल्यासारखी होती. आता इथेच मतदान केंद्र उभारायचं म्हंटल्यावर स्टाफने साफसफाई सुरु केली. ह्यांडपंपावरून पाणी आणून आतली जमीन भिजवून घेतली.  .
वाडी म्हणजे हॉटेल धाबा नाहीच रात्रीच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून वाडीवरच्या २-४ पोरांना हाताशी धरल. पोरांनी आपापल्या परीने घरोघरी शिजवलेल्या दोन दोन नाचणीच्या भाकऱ्या आणल्या होत्या. सोबत कांदा आणि लसून मिरचीचा ठेचा. कुणीतरी भरलेली वांगी आणली होती. सगळ मोफत बर का.! पोटभर खावून झाल होत. पण आता रात्री शाळेत झोपण शक्य नव्हतच. १-२ विंचू सुध्दा मारले होते की साफसफाईच्या वेळी. त्यात पोरांनी अजून एक भीती घातली इथे रात्री लांडगे येतात म्हणे. अर्थात त्यातून मार्ग सुध्दा त्यांनीच काढला.
      रात्री आमच सगळ समान घेवून आम्ही वाडीवर गेलो. तिथल्या एका मोठ्ठ्या पटांगणात भलमोठ कुंपण केलेलं होत. आत बऱ्याचश्या बकऱ्या अन मेंढर होती. अख्या वस्तीची मेंढर एकत्रच ठेवायची हि लोक. अधेमधे बाजली टाकलेली होती. सगळी तरणी पोर त्या कुंपणातच झोपायची मेंढरांची राखण करायला. आज हा योग आमच्यासाठी जुळून आला होता. लाकडी बाजल्यावर पडून त्या चांदण्या रात्रीत, गार वाऱ्याच्या झुळुकी अंगावर घेताना कुंपणातल्या मेंढ्या-बकऱ्यांच्या मुत्राच्या वास कुठेतरी दूर पळून गेला होता. रात्रभर वाडीवरच्या धनगर पोरांशी राजकारण अन वाडीचा विकास यावरच्या गप्पा मारण्यात झोप कधी लागली ते कळलच नाही.
      गाढ झोपेत असताना अचानक वाडीवरची सगळी कुत्री भूकायला लागली. भूकता भूकता कुत्र्यांनी मेंढर असलेल्या कुंपणाभोवती त्याचं सुरक्षा कड तयार केल. सगळी पोर काठ्या, भाले घेऊन सज्ज झाली. “वाडीजवळ लांडगी आल्यात” “आलो लगी हुसकावून”! म्हणत काही पोर काळोखात कुठतरी धावत गेली. त्यांच्या सोबत बरीचशी कुत्री सुद्धा धावत सुटली. अन थोड्याच वेळात सगळी पोर पुन्हा कुंपणात परतली. आमच्या मात्र अंगावरचा काटा जाता जाईना.
      दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कोंबड आरवताच वाडीवरून बकरीच्या दुधाचा चहा, आणि कांदापोहे असा छान नाश्ता मिळाला. मतदान व्यवस्थित सुरु होत. मतदानाला साठी-सत्तरीची म्हातारी मंडळी अन विशी-पंचविशीची तरणी पोर एवढीच.! ४०-५० वयोगटातली सगळी मंडळी मेंढर घेवून कोकणात गेली होती. वाडीवर वीज होती. आत्ता पर्यंत वाडीवर सरकारी योजनेतून काही घरकुल आणि एक ह्यांडपंप या पलीकडे विकास म्हणण्या इतपत वेगळ काही नव घडलेलं दिसत नव्हत. “”निवडनुका आल्या का फुढारी मंडळी वाडीवर येत्यात आन ह्यांव करू त्यांव करू सांगत्यात” “कोन काय करीत नसतय बगा” हीच ओरड प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडत होती.
      दुपारी मस्त पैकी गावरान कोंबड्याची मेजवानी उडवून आम्ही तृप्त झालो होतो. सायंकाळी मतदान संपल. जाता जाता आम्ही सर्वांनी मिळून काही पैसे जमा केले आणि आमची चोख व्यवस्था करणाऱ्या त्या पोरांना देऊ केले. पण अस्सल धनगरी गावठी मन ते त्यांनी ते पैसे घेतली नाही. “”सायेब तुमी आमच पाव्हन”’ “”तस बी आमच्या वाडीकड कुणी टोकवत न्हाई निवडनुकीमूळ का होईना तुमच्या सारख्याला आमच आयुक्ष आन हाल बगाय मिळत्यात” “ह्यो आमचा पाहुनचार”! त्याच्या धनगरी ठेक्यात त्यान त्याच मन मोकळ केल. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो. सोबत होता परिस्थितीने कफल्लक पण मनाने श्रीमंत असलेल्या लोकांच्या सहवासाचा अनुभव. अन शेंडगेवाडी वरच्या पाहुणचाराची बहुमोल शिदोरी.!!
...
...

मन्या ठाकूर 

Wednesday, 28 December 2016

“स्मारक”



       पडताच वार्ता कानावरती...तो रायगड पुन्हा का रडला होता.
सागरी स्मारक उभे राहते...पण गड बुरुज तो खचला होता.

       पाहताच तो ताशिव कातळ...शिव मनात हर्षे रुचला होता.
इथेच तख्त हिंदवी स्वराज्य...का स्वये शिवप्रभू वदला होता.

       उभे कराया हिंदवी सिंहासन...मावळा रक्ताने भिजला होता.
पाहण्या राज्याभिषेक शिवाचा...गड राजधानी तो नटला होता.

       स्मारक तेची मनात अमुच्या...जिथे प्राण शिवाचा थांबला होता.
शिव समाधीचा अमुल्य ठेवा...छातीशी त्याने जपला होता.

       समुद्री पोटी शिव स्मारकाचा... पाया नवा हा रचला होता.
गड बुरुजांवर प्रेमी युगुलांचा...स्वप्न महाल तो सजला होता.

       कुठे दारू मटणाच्या पार्ट्या...गड बाटल्या पिशव्यांनी माखला होता.
पडके बुरुज ढासळती तटबंदी...ढीग दगड झुडूपाचा उरला होता.

       सागरमार्गे ओळखून धोका...शिव बलाढ्य आरमार निर्मित होता.
भुई अश्वाच्या टापेखाली...समुद्र मुठीत धरला होता.

       नौदल आमुचे निष्प्रभ ठरले...शासनदरबारी फिकीर न चिंता
सागर वेढा तोकडा तो पडता... का २६/११ घडला होता.

       गगनभेदी ते स्मारक उभरते...उत्साह मनामध्ये भरला होता.
शत्रू शिरतो समुद्र मार्गे...आदर्श शिवप्रभूचा हरला होता

        कित्येक कोटीचे खर्च स्मारका...इथे तलवार तुकडा चोरीला होता.
जगश्रेष्ठ स्मारक उभे पण... इथे शिवचरणांचा धुरळा होता

        डोंगर दऱ्याचा तुफान वारा...खुल्या दर्याला भिडला होता.
सह्याद्रीचा वाघ आज का...पुतळ्या मध्ये अडकला होता.

       उद्या कदाचित नव स्मारकाच्या... सहल भेटीचा येयील भरता.
शिव भक्तांना स्पुर्ती देण्या... हा सहवास गडाचा राहो पुरता.

        पुजत राहू मनात रायगड...इथे अखेर शिवप्रभू निजला होता.
शिवसमाधीचा हरएक पत्थर...शिव पराक्रमाची गातो गाथा.



...
...
      मन्या ठाकूर


Thursday, 22 December 2016

“”निर्लज्जपणा”


           भारत पर्यटणाला आलेली ती वेदेशी महिला हातातल चिप्सच रिकाम पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली. माझ्याकड रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या बेगडी देशप्रेमाची.!
         
         त्यान बेकायदेशीर काम करण्यासाठी मझ्याकड सरकवलेल नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबल आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारख हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावल. त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची.!

           रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली. तिच्या नजरेतली भिक मी स्पष्टपणे पहिली तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या दीखावेबाज श्रीमंतीची.!

       बलात्काराच्या केस मधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली. बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची.!

          एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केल. फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानी नंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकली. मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली. त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची.!

           समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या पण जिथे माझा राजान अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली. शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली. प्रेमी युगुलांची नाव लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या नादान शिवभक्तीची.!

          गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला. आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे आभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला. डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला. तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची.!


           २६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या. त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले, माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले तरीही मला लाज नाही वाटली ....लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
.....


                  पण अजूनही मला लाज नाही वाटत....माझ्या विक्षिप्त निर्ल्लजपणाची.!.
......
                 मन्या ठाकूर.

"सावित्रीचा प्रकोप"


 

          त्या अमावस्येच्या किर्रर्र रात्री मोबाईल फोन खणखणला. पोलीस ठाण्यातून फोन होता. महाड हायवे वरचा पूल वाहून गेला दोन एसटी बस सावित्री नदीत पडल्या असून आपल्याला तात्काळ बंदोबस्ताला रवाना व्हायचं आहे." फोन वरील पोलीस कर्मचाऱ्यान कळवल. घटनेच गांभीर्य ओळखून पावसात भिजत आम्ही खाजगी मोटार सायकलने तात्काळ बंदोबस्ताला रवाना झालो. घटनास्थळी पोहचताच निसर्गाच ते महारुद्र भयावह स्वरूप पाहिलं. दुथडी भरून वाहणारी फेसाळती सावित्री नदी भलतीच खवळलेली भासत होती. कल्पना केल्या पलीकडे प्रकरण जास्तच गंभीर होत. ब्रिटीश कालीन बांधकाम असलेला पूल मधोमध तुटून वाहून गेला होता. डोळ्यांवर विश्वास न बसण्यासारख थरकाप उडवणार भयाण चित्र दिसत होत. प्रत्यक्षदर्शिंच्या मते दोन एसटी बस आणि काही लहान वाहन देखील वाहून गेली होती.

          रात्रीच्या किर्रर्र काळोखात तुफान बरसणाऱ्या पावसात पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला हजर झाले. घटना मिडिया वर दिसू लागल्याने लोकांची गर्दी वाढू लागली. लोक पोलिसांना न जुमानता पुलावर आणि नदी किनाऱ्यावर जाऊ लागले. रस्त्यात अनावश्यक वाहनांची कोंडी होऊ लागली. वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर गर्दी हटवण्यासाठी नेमण्यात आले. चिखलात, पाण्या पावसात, जिथे २ मिनिट विश्रांतीसाठी देखील बसता येणार नाही अश्या ठिकाणी पोलीस कर्मचारी खडा पहारा देऊन लोकांची गर्दी थांबवू लागले. १२ तासाहून जास्त वेळ आमची ही दमछाक सुरुच होती. 

          गर्दीतील बरेचजण झाल्या घटनेला पोलिसच जबाबदार असल्या सारख आम्हाला शिव्या-शाप देत होते. दिवस उजाडताच एन.डी.आर.एफ.टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या जवळच्या साधन सामुग्रीच्या माध्यमातून स्वताचा जिव धोक्यात घालून ते जवान त्या तुफानी नदी प्रवाहात स्वताला झोकून देत होते. 

          नदीप्रवाहावर हेलिकॉप्टर देखरेख करीत होत. घटनेच कव्हरेज चित्रण करायला अनेक न्यूज च्यानेलचे क्यामेरे लागले होते. त्यातील कित्त्येक उद्दाम न्यूज रिपोर्टर तर पोलिसांना अगदी कुत्र्याची वागणूक देऊन स्वताच्या मनाला वाटेल त्या मोक्याच्या जागा घेऊन चित्रीकरण करू लागले होते. बर.. काही बोलाव तर उगाच विषय चिघळवळायला त्यांच्या बापच काय जातय?.

         त्या खवळत्या प्रवाहाच्या पाण्यात सलग ४-५ तास शोध मोहीम राबवुन विश्रांतीसाठी किनाऱ्यावर येऊ पाहणाऱ्या एन.डी.आर.एफ. जवानांना  किनाऱ्यावर येऊ न देताच हे रिपोर्टर निर्लज्जपणे त्यांच्यावर आपल्या प्रश्न्नाचा भडीमार करीत होते. कित्तेक रिपोर्टर तर टी.आर.पि निमित्त लाईव्ह शोध मोहीम दाखविण्यासाठी एन.डी.आर.एफ.च्या बोटीत बसून चित्रीकरण करण्याचा हटट करीत होते. तो हटट त्यांनी पुरा केला सुद्धा म्हणा.! 

          घटनास्थळाला राज्याचे अनेक ज्येष्ठ अन् श्रेष्ठ नेते भेट देऊ लागले होते. पोलिसांना एकाचवेळी दोन्ही महत्वाचे बंदोबस्त करावे लागत होते. काही स्थानिक लोक जात, धर्म बाजूला सारून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पाण्यात सापडणारी मृत शव पाण्याबाहेर काढून शववाहिनी पर्यंत पोहचविण्यात मदत करीत होते. बंदोबस्ताला असलेल्या नवीन भरती झालेल्या पोलीस जवानांची स्थिती तर अतिशय केविलवाणी अन् दयनीय झाली होती. काहीलोक आणि न्यूज रिपोर्टर एकत्र मिळून घटनेच गांभीर्य सोडून त्यां जवानाचीच खिल्ली उडविण्यात मग्न होते. मृतांचे मिळणारे शव प्रथम आपल्याच च्यानेलवर दिसावं यासाठी त्यांची धडपड सुरु होती. लोकांच्या हातातील मोबाईल मृतांप्रतीच्या बेगडी भावना स्पष्ट करीत होते. मृत शरीर पाण्याबाहेर काढण्यापूर्वी त्यांना छायाचित्र काढून घेण्याची गरज जास्त वाटत होती.

        इकडे नियंत्रण कक्षात मृतांच्या नातेवाईकांची तौबा गर्दी उसळली होती. प्रत्यक्ष पोलीस नियंत्रण कक्षातील माहिती आणि व्हाटस् अप वर फिरणारे छायाचित्र , अफवा तसेच मीडियावर झळकणारे मृतांचे आकडे यात कमालीची तफावत दिसून येऊ लागली. लोक मोबाईल आणि टीव्हीवर येणाऱ्या माहितीवरून पोलीस अधिकाऱ्यांना खोदुन खोदुन माहिती विचारीत होते. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची पुरती दमछाक होत होती. अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत आवाहन करताच मृतांचे नातेवाईक संतापुन अधून मधून अधिकाऱ्यांनाच शिव्या देऊ लागले होते. प्रत्येकाला आपल्या नातेवाईकांची काहीना काही माहिती हवीच होती. 

      तिकडे सरकारी दवाखान्यात पोलिसांची एक टीम नदी पत्रात मिळून येणाऱ्या मृतांच्या शरीरावर पोस्टमार्टेम करण्यासाठी आवश्यक कागदोपत्री कार्यवाही करण्यात गुंतली होती. तहान भूक विसरून सर्व पोलीस यंत्रणा झटून कामाला लागली होती. अनेक महाभाग दवाखान्यात गर्दी करून पोलिसांना पंचनाम्यात सुद्धा अडथळे निर्माण करीत होते. कुणी राजकीय नेते सरकार वर टीका करण्यात मग्न होते तर काही सेवाभावी संस्थाचे स्वयंसेवक मृतांच्या नातेवाईकांना जेवण पाण्याची सोय करून देवून मानवतेच दर्शन घडवून देत होते.

         निसर्गाच्या या प्रकोपाला आज माझ्या कोकणचा निर्दोष सामान्य माणूस बळी पडला होता. या घटनेचा कोणी सोहळा म्हणून चवीने चित्रीकरण करीत होत तर कुणी संधीसाधू सोशल मीडियाचा वापर करून अफवांच बीज परत होत. कुणी राजकीय पोळ्या भाजत होत तर कुणी पोकळ आश्वासन देत होत..कुणाचे हात प्रत्यक्ष मदतीसाठी साथ देत होते तर कुणाचे हात मोबाईलने छायाचित्र काढण्यात मग्न होते. कुणी जात धर्म बाजूला सारून घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना अन्न पाणी निवारा देत होते तर कुणी महभाग फुकटात मिळणार फूड पाकीट गाडीच्या डिक्कीत लपवण्यात गुंग होते. कुणी पोलीस आणि प्रशासनाला नाव ठेवण्यात धन्यता मानत होत तर कुणी प्रशासनाला मनापासून मदत करण्यात गुंतल होत. .......
         काहीही असो पण या भयाण आणि छातीत धडकी भरविनाऱ्या प्रसंगात माणसाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच दर्शन मात्र सहज घडत होत.!!!
     .....
     .....
     मन्या ठाकूर

" रक्तफुल "


          रविवारी नेहमीप्रमाणे मित्रासोबत सकाळी मॉर्निंग वॉक करीता निघालो होतो. बाहेर मस्त धुकं पसरलं होत. हवेत प्रचंड गारवा होता. वा-याची हलकीशी झुळूक देखील अंगावर काटे उभे करीत होती. गावाच्या वेशी बाहेर येताच आपसूक एक दृष्य नजर वेधून घेऊ लागलं. गावा पल्याडच्या डोंगरावर वणवा पेटलेला दिसत होता. "काल संध्याकाळ पर्यंत तर रान बर दिसत होत.''! "या असल्या अंग गोठवणा-या थंडीत सुद्धा वणवा पेटला."? मी मित्राला उद्देशून विचारलं. कसला वणवा रे कोणीतरी रान पेटवलेल दिसतंय.! मित्र पुटपुटला.! काय ? पेटवल असेल .? खरंच.? चल मग आज रानातच जाऊन येऊ.! अस म्हणत मी मित्राची सहमती मिळवली अन आम्ही थेट राना च्या दिशेने चालत वणवा लागलेल्या भागाकडे निघालो.
           सुरुवातीलाच हिरवागार पसरलेला डोंगर, पिवळ्या निळ्या लाल फुलांचा बहर आलेली वृक्षराई, पाणी आटत चाललेले लहान लहान गोंडस ओढे, गवतावर मोत्यासारखे उठून दिसणारे दवबिंदू, असा मनमोहक देखावा डोळ्यात साठवीत आम्ही पुढे पुढे जात होतो. घनदाट रानात गर्द झाडी झुडपं, कर्दळीच्या जाळ्या, अन काट्या कुट्यातून वाट काढत रुळलेल्या पायवाटा धुंडाळत पायात गुंतणार गवत तुडवत जाताना झाडाच्या फांदीवर, शेंड्यावर बसून ओरडणा-या पाखरांचा वेगवेगळा मंजुळ आवाज, कुठे एखाद्या सागाच्या झाडावर तुरुतुरु धावत हळूच लपून बसणा-या खारीची टिवटिव. आमची चाहूल लागताच भुर्ररकन उडणा-या कवड्यांची नि पाळा पाचोळ्यातून पळणा-या सरड्याची सरसर, अन पाठीवर सोनेरी तपकिरी पंख घेऊन डोकवणा-या भारद्वाजचा घनगंभीर आवाज ऐकण्याची मजा काही औरच वाटत होती.
          अर्धा एक मैल चालून झाल्यावर डोंगर उतारावर वा-याच्या झुळकी सरशी सळसळणार गवत दिसू लागलं. गवतावर फुललेल्या रंगबिरंगी फुलांचा गालिचा, त्यापल्याड दिसणारा काळभोर कातळ, दूरवर पसरलेल्या डोंगर द-या, उंच आभाळाला भिडलेली झाड, त्यातून डोकावणारी सूर्यकिरणे, अन अथांग पसरलेल निळशार आभाळ पाहून हि भटकंती कधी संपूच नये अस मनोमन वाटू लागलं. रानातल्या सकाळच्या वातावरणाने मन अगदी प्रसन्न वाटू लागलं. मग डोंगराची एक टेकडी उतरून दुस-या टेकडीवर चढू लागताच आभाळात निळसर काळया धूराचे लोट दिसू लागले. हळू हळू हवेत पसरलेला धुरकट वास जाणवू लागला. अन दिसू लागली आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली अर्धवट करपलेली जांभूळ, आंबा, साग, राजणाची अबोल पण कन्हाणती झाड अन कर्दळीच्या जाळ्या.!
            कुठं एखाद्या झाडावर अर्धवट जळून गेलेली पाखरांची घरटी दिसत होती. तर कुठं झाडाच्या बुंध्यात पडलेली फुटकी करपलेली अंडी अन पाखरांची भाजून मरून पडलेली इवलीशी नवजात पिल्ल.! डोंगराचा बराचसा भाग जळून बेचिराख झालेला दिसत होता. कुठं होरपळून उरलं सुरेल गवत धुरटत होत. तर कुठं अर्धवट जळका सर्प वासळत होता. वणव्याचा तो भस्मासूर हळू हळू ओल्या गवताला अन झाडी झुडपाला गिळत पुढे पुढे सरकतच होता. आजूबाजूला काही पाखर या झाडावरून त्या झाडावर फडफडत होती. उध्वस्त झालेल्या संसाराच दुःख अन पिलांच्या विरहाचा आक्रोश त्याच्या इवल्याश्या चित्कारात स्पष्ट जाणवत होता. आभाळात घिरट्या घालणा-या काही घारी मध्येच जमिनीकडे झेपावत होत्या. आयत्या मिळालेल्या मेजवानीचा लाभ उचलायला निघालेली एक घोरपड जवळच एक जळक पाखरू गिळत होती. काही तुरळक मोठाली झाड वगळता इतर सार काही रखरखीत दिसत होत.!
          रानात कुठंकुठं शिकारीसाठी तंगूस धाग्याची जाळी लावलेली दिसत होती. तर कुठे फासक्या होत्या. काही जाळात रक्त सांडलेल दिसत होत. अर्धवट जळकी म्हणून स्वस्तात लिलावात मिळणारी मौल्यवान वृक्ष संपत्ती अन ताज्या शिकरीसाठीच कुणीतरी निसर्गाला दिलेला हा त्रास स्पष्ट जाणवत होता. अगदी जंगलबुक मधल्या प्राण्यांना मानवाने ताबा मिळवलेल्या ज्या फुलाची अतोनात भीती वाटत असते तेच ते "रक्तफुल" म्हणजेच आगीची "ठिणगी" अग्नी तांडव करीत इथल्या वन्य जीवांचा इवलासा संसार उध्वस्त करीत होत. वन्यजीवांच रक्त पित होत. रानात शिरताना सुरुवातीला प्रसन्न झालेलं मन क्षणार्धात खिन्न सुन्न झालं होत. रानातल्या झाडांची, पाखरांची अन मुक्या जनावरांची झालेली होरपळ मनाला चटका लावीत होती. शहरात अन गावातल्या सिमेंटच्या वाढत्या जंगलापायी जनावरांचा अखेरचा आधार ठरलेला हिरवागार डोंगरमाथा देखील आता त्यांना आश्रय देऊ शकत नव्हता.

          आम्ही खिन्न मनाने पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. "रक्तफुला"च्या अग्नी तांडवातून निसर्गला स्वतःला सावरता येत, शुष्क झालेल्या मातीत नवे अंकुर उम
लवता येतात. अन करपट भाजलेल्या झाडांना नवी पालवी देऊन वन्य जीवांना पुन्हा आपल्या कवेत घेवून हसावंता येत.! या एका भाबड्या आशेवर मी मात्र निश्चिन्त होत होतो.!

             .....

          मन्या ठाकूर