Tuesday, 28 March 2017

आमचा आगरी समाज अन लग्न पद्धती

आमचा आगरी समाज  अन लग्न पद्धती
भाग -१

आगरी समाज  महाराष्ट्रात प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. आगर म्हणजे भात पिकणारे खाचर किंवा मीठ पिकवणारे मिठागर. अशा आगरात काम करणारे ते आगरी होय. प्रामुख्याने ठाणे, रायगड जिल्ह्यातील हा समाज मुंबईत देखील काही ठिकाणी विखुरलेला आढळून येतो. शेती हाच मुळ व्यवसाय असलेला परंतु त्याच जोडीने समुद्रात मिठागरे तयार करून मिठ विक्री करणारा हा समाज मिठ-आगरी म्हणून ओळखला जातो. सरखेल कान्होजी आंग्रे राजांच्या आरमारात कोळी, भंडारी, मराठा, मुस्लीम यांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याची राखण करण्यासाठी खोल समुद्रात उतरून जीवाशी खेळणारा समाज आजही आपल्या मायभूमीत अभिमानाने ताठ उभा आहे.

अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये १९३३ ते १९३९ असा सहा वर्षे टिकलेला शेतकर्‍यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपात, लढ्यात आगरी समाजाचा सिंहाचा वाटा आहे.  याच लढ्यामुळे कुळकायदा अस्तित्वात आला. कसेल त्याचीच जमीन अस ठणकावत जमीनदार पद्धतीच्या पेकाटात लाथ घालून देशाला कुळ कायदा देणाऱ्या अत्युच्च कल्पनेच उगमस्थान असलेला हा समाज मात्र या श्रेया पासून अद्यापही दुर्लक्षित आहे.

आगरी समाजाची स्वतंत्र लेहजा असलेली परंतु कोळी भाषेशी सांधर्म्यं असलेली अशी आगरी भाषा आहे. या भाषेत आजोबा-डोक्रा/आजूस, आजी-डोक्री/आयव, बाय, वडील, मोठा भाऊ-दादुस, वयाने लहान मुलगा-बाला असे वेगवेगळे शब्दोल्लेख आढळून येतात. या भाषेतून समाजाचा भाबडेपणा, अन मागासलेपण सहज लक्षात येतो. संस्कृती, लोकगीत, म्हणी, धवलगीत, पक्वाने, अन्नपदार्थ यातील आगळेवेगळेपणा राखणारा अमुल्य ठेवा या समाजाने आजवर जपलेला आहे. देवभोळा त्याच बरोबर अंधश्रद्धाळूमंत्र तंत्र जादूटोणा, भगतगिरी, मांत्रिक यावर विश्वास ठेवणारा समाज म्हणून देखील त्याची वेगळी ओळख सांगता येयील.

मुळात कोळी अन आगरी हि एकाच आईची दोन लेकर असल्याच बोलल जात. हे दोन्ही समाज समुद्रावर तितकेच अवलंबून असतात. कोळी खोल समुद्रात गेला तर आगरी किणाऱ्यावर थांबला. खाडी, शेततळी यात मासेमारी करून आपली मच्छीमार म्हणून तो वेगळी ओळख जपू लागला. आगरी लोक शेतकरी आणि मिठकरी या बरोबरच शिल्पकार देखील होते. नाशिकमधील पंचवटीमधील मंदिरे, तिथले ते उत्कृष्ट शिल्पकाम आगरी पाथरवटांनी घडवले आहे. घारापूरची लेणी जगप्रसिद्ध आहे. त्या भागाचे मूळ नाव अग्रहारपुरी असे होते. अग्रहारपुरी म्हणजे आगरी लोकांची नगरी होय. इथली भव्यता दर्शवणारी सुंदर शिल्पे आगरी पाथरवटांनी घडवलेली आहेत. आजही पेण तालुक्यातील आगरी समाजाचे गणेश मूर्तिकार भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध होवू पाहत आहेत. त्यांच्या तरबेज हाताने घडलेल्या सुरेख गणेश मूर्तीना परदेशात देखील मागणी असते.


भाग -२

आगरी समाजाच्या वास्तव्याबाबत अन इतिहासाबद्दल निरनिराळ्या दंतकथा सांगितल्या जातात. परंतु खात्रीशीर अशी कोणतीही ऐतिहासिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. आगरी लोक प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यालगत वस्ती करून राहतात. गावाचे पाडा पद्धतीने लहान मोठे भाग पडलेले असतात. गावांची नावे ......वली, पाडा अशीच आढळून येतात. पूर्वी पाच किंवा बारा गावचे मिळून असे पंचक्रोशीचे पंच एकत्रितपणे विभागासाठी नियम ठरवीत असत. पंचांच्या समक्ष गावच्या चावडीवर न्यायनिवाडे करून तंटे सोडवले जात असत. फार पूर्वीपासून ते आजतागायत पंचांच्या पर्यायाने गावाच्या निर्णया विरुद्ध जाणाऱ्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची पद्धती या न्यायनिवाड्यात बहुतांशी अवलंबिली जात असे. परंतु आता शासकीय कायद्यातील बदल अन समाज प्रबोधनातून हा प्रकार बराचसा कमी झालेला दिसून येतो.
  
आगरी समाज देवभोळा असल्याने राम, मारुती, गणपती यांच्या बरोबरीने बहिरीदेव, बापदेव, जाखमाता, गिरोबा, म्हसोबा, अशी विशेष नावे असणारी दैवते देखील या समाजात पूजनीय आहेत. परंतु या दैवतांची मंदिरे गावाच्या वेशीजवळ आढळून येतात. बहुतेक देवतांची तर मूर्ती किंवा मंदिरे न उभारता निव्वळ एखादा दगड देखील शेंदूर लावून मानाने पुजलेला दिसून येतो. या दैवतांना अधून मधून कौटुंबिक कार्यात आणि वर्षातून एकदा गावटाकणीच्या वेळी दारू, कोंबडा, बकऱ्याचा मान देण्याची पारंपारिक प्रथा आजही तितक्याच भक्तिभावाने पाळली जाते. अलीकडे कार्ले- एकविरा या देवस्थळाच आगरी समाजावर अतिशय गारुड पसरलेलं दिसून येवू लागल आहे.

आगरी समाजात गावटाकणी हा विशेष उत्सव गावात साजरा होतो. पूर्वी या उत्सवात गावातील लोक त्या दिवशी गाव सोडून गावाच्या वेशीबाहेर रहायला जात असत. आजूबाजूच्या गावातील आप्तेष्टांना, नातलग, मित्रमंडळींना बोलावून त्यांच्या सोबत गावटाकणीचा प्रसाद म्हणून मटणाच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला जात असे. अजूनही काही ठिकाणी त्याच पारंपारिक पद्धतीने गावटाकणीचा उत्सव साजरा केला जातो. परंतु कालपरत्वे बऱ्याच गावांमध्ये आता गाव न सोडता गावातच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आता रूढ होवू लागली आहे.

सह्याद्रीच्या कुशीत अन अरबी सागराच्या अंगा खांद्यावर खेळत वाढलेला समाज वेशभूषा अन दाग-दागिने या बाबतीत देखील बहुतांशी कोळी समाजाची घनिष्ट जोडला गेलेला आहे. पूर्वीच्या आगरी लोकांच वर्णन करायचं तर स्त्रिया कोळी पद्धतीचे काष्टी पातळ नेसलेली, चमकदार काळसर रंगाची चोळीआणि गळ्यात मण्यांची बोरमाळ, काळेमण्याच डोरल, २५ पैशाच्या नाणे सदृश सोन्याच्या छापील नक्षीकामाची माळकानात मोठ्या कोलंबीप्रमाणे जाडसर अशी कानातलेत्याच्या वजनाने आपली करंगळी जाईल इतपत कानाच्या पाळीला पडलेले होल, डोक्यावर खोंडा, असा पेहराव करीत तर पुरुष कंबरेला रुमालप्याटलोन, सफेद शर्टखाकी हाप प्यांट, टोपी, धोतर, तर अधून मधून सदरा-लेंगा असा पेहराव करीत असत.  तर पूर्वीच्या तरूण मुली पोलके परकर असा पेहराव करीत. परंतु बदलत्या युगा अन जगा बरोबर या समाजातील लोकांचे पेहराव देखील बदलत जाऊ लागले आहेत.


भाग -३

आगरी लोकांचा मूळ आहार शेती उत्पादनातील भात, तांदळाची भाकरी, भाजीपाला असा जरी असला तरी खाडी, शेततळी यातील मासळी बरोबरच सुकी मासळी देखील त्यांना विशेष प्रिय असते. जेवणात भाजणीचे सुके खोबरे म्हणजे आगरी लोकांच विशेष किचन टिप्स म्हणता येईल. पेण तालुक्यात एखाद्या मंगल कार्य प्रसंगी या भाजणीच्या सुक्या खोबऱ्याच्या वाटणाचा मसालेदार मारा असलेली चवळीच्या भाजीची चव तर अगदी मांसाहार जेवणाला सुद्धा थांब सांगेल. या समाजात शेती विषयक एकत्र काम करण्याची पद्धत हंदा म्हणून ओळखली जाते. अगदी आजतागायत शेतीची बहुतांश कामे या हंदा पद्धतीनेच पार पडली जातात. आगरी वस्ती असलेल्या गावोगावी असे ४-५ हंदे असतात. एकत्र मिळून एकमेकांची गाण्यातून-म्हणीतून चेष्टा मस्करी करतानाच कदाचित याच हंदा पद्धतीतून या समाजाची लोकगीते, संगीत, धवलगीते निर्माण झाली असावी. अश्या या हंद्यात एकत्र मिळून काम करताना एकमेकांच्या अंगावर चिखल फेकून गाण्यातून टर उडवण्याची मजा करणे म्हणजे आनंदसोहळा.!

पूर्वी आगरी समाजात गणेशोस्तवात धावरा नाच, होळीला शिमगा नाच असे विशेष मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. (या नाचात दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण यात कमालीच साम्य आढळून येत) आजही पेण-अलिबाग तालुक्यातील गावातल्या जेष्ठ महिला गणेशोस्तव आणि होळीला एकत्र मिळून फेर धरून लोकगीते गावून नाचतात. या समाजात कबड्डी, बैलगाडी शर्यत या खेळांची विशेष आवड असून हा करमणूकीचा प्रकार आगरी लोक आजतागायत जपत आले आहेत. त्याच बरोबर भजन, कीर्तनाची गोडी असणारी मंडळी देखील तुरळक प्रमाणात दिसून येतात.

आगरी समाजात परंपरा म्हणून अनेक पद्धती आजही रूढ असल्याच दिसून येत. उदा. माहेरवाशीणीच आगोट जेवण, या पद्धतीत सुगीच्या काळात म्हणजेच भात लावणीच्या कामांना सुरुवात होण्या आगोदर सासरी गेलेल्या लेकीला माहेरी बोलावून तिला जेवण घालून पुन्हा सासरी पाठवणी करताना तिच्या बरोबर शिदोरी ,म्हणून  चणे फुटाने, रवा-मेथीचे लाडू, असा फराळ दिला जातो. त्याच बरोबर लग्नानंतर गणेशोस्तवात माहेरी गेलेली नवी नवरी सासरला गौरीपूजन करायला जाते तेव्हा डोक्यावर माहेरून आणलेला फराळ भरलेल सूप घेऊन जाते. त्या प्रथेला ववसा असे म्हणतात. हि अशी ५ ते १० सुपे माहेरून आणली जात. त्यानंतर एक सूप सासरी ठेवून बाकी सुपे नव्या नवरीच्या नंदांना पोहचवली जातात. तसेच आगरी समाजात स्वतंत्र असा नामकरण विधी न करता जेव्हा विवाहिता पहिल्या बाळंतपणानंतर बाळासह तिच्या सासरी जाते त्यावेळीच नामकरण समारंभ आटोपला जातो, त्या प्रथेला पावनेत असे म्हणतात. आगरी लोकांच्या या सगळ्या प्रथांच वैशीष्टय म्हणजे गावजेवण. हळद, लग्न, पावणेत, या पासून अगदी श्राद्धा पर्यंत आगरी लोकांच्या गाव जेवणावळीच्या पंगतीच्या पंगती उठत असतात. म्हणूनच उधळेपणात आगरी समाज अव्वल समजला जातो.

ह्या उधळेपणाला जोड मिळाली ती मुंबई, ठाणे, रायगड प्रांतातील आगरी लोकवस्तीजवळ औद्योगिकरणामुळे झपाट्याने झालेली जमिनींची विक्री अन त्यातून या भाबड्या लोकांच्या हाती अचानक आलेला पैसा यांची. मग त्या पैशाला पाय फुटू लागले लग्न समारंभातील बडेजावातून. अन आता शेवटी या समाजाला जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशीन काय.? असा सवाल विचारायची वेळ येवून ठेपली आहे. हे जरी खर असल तरी आगरी समाजातील लग्नाची प्रथा, परंपरा यांची शान काही औरच.! निव्वळ बडेजाव, वारेमाप खर्च यामुळे नव्हे तर लग्नातील पुरातन पद्धती अन धवलारनीच्या वेगळ्या सुरातील धवलगीतांमुळे.! आगरी लग्न पद्धती हि महाराष्ट्रातील इतर समाजांशी काही अंशी मिळती जुळती असली तरी बारकाईने पाहिलं तर प्रथा, परंपरा यात कमालीचा वेगळेपणा जाणवतोच.!

आगरी समाज  अन लग्न पद्धती
भाग - ४

आगरी समाजात पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे (आत्येभाऊ-मामे बहीण) तसा हा रिवाज महाराष्ट्रात इतरही काही जातींमध्ये आहे. परंतु आगरी समाजाच वैशिष्ठ्य सांगायचं झाल तर  आगरी समाजात हुंडापद्धत फार पूर्वीपासूनच अस्तित्वात नाही. त्याही पलीकडे पाहिलं तर विधवापुनर्विवाहाला मान्यता देणारा हा अतिशय पुरातन समाज आहे. कालपरत्वे आता इतर समाजाप्रमाणे आगरी लोकांच्यातही मामाच्या मुलीशी विवाह करणारी तरुणाई फारशी आढळून येत नाही. पूर्वी असे विवाह हे गावातल्या गावात किंवा गावाच्या आजूबाजूच्याच बारा गावांमध्ये नातेसंबंध जोडून होत असत. मात्र आता अगदी तालुक्याबाहेर देखील मुली दिल्या जातात. व्यावसायिक दृष्टीकोन, कौटुंबिक कारणे, प्रेमसंबंध अश्या अनेक गोष्टीतून हा फरक स्पष्ट जाणवू लागला आहे.  

आगरी समाजातील लग्न कार्य प्रमुख्याने ३ दिवस चालते. लग्न कार्यात पहिल्या दिवशी चूनदुसऱ्या दिवशी हळद आणि तिसऱ्यादिवशी लग्न असा कार्यक्रम असतो. त्यानंतर वर पक्षाच्या परिस्थिती नुसार श्री सत्यनारायणाची पूजा आणि कुलदैवताचा गोंधळ असे गावजेवणाचे कार्यक्रम असतात. अर्थातच गावजेवणाशिवाय आगरी लोकांना घरात कार्य उरकल्याच समाधान मिळत नाही हे प्रमुख कारण असाव बहुदा. आगरी समाजातील लग्नातील प्रमुख आकर्षण म्हणजे हळदीचा कार्यक्रम.! अलीकडे आगरी लग्न पद्धतीत हळदीच्या समारंभाला विशेष महत्व प्राप्त होवू लागल आहे. ते म्हणजे हळदीच्या दिवशीच्या मटन, मद्यपान सह बेंजो अन डीजेच्या तालावर जल्लोषात होणाऱ्या धम्माल नाचामुळे.!

लग्न ठरविताना वधू-वरच्या पसंती नुसार साखरपुडा कर्यक्रम आयोजित केला जातो. बऱ्याच ठिकाणी या कार्यक्रमाला पूर्वीपासून कुंकू लावणी/सुपारी फोडणी चा कार्यक्रम असे बोलल जात. पूर्वीच्या काळात इतर समाजाप्रमाणे आगरी समाजातही घरातील ज्येष्ठ मंडळींनी ठरविलेल्या ठिकाणी किंवा त्यांच्या पसंती नुसारच विवाह होत असत. वधू वरांच्या पसंतीचा काहीएक संबंध लग्न कार्याशी नव्हता. अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत वधू-वराने एकमेकाला साध पाहिलेलंही नसल्याच अनेक जेष्ठ मंडळी अनुभव म्हणून सांगतात.

आगरी लग्न कार्यात पारंपारिक गीते (धवला) म्हण्यात येतात. या धवलगीतांतून आगरी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा आजतागायत अभिमानाने जपला आहे. आणि अशी हि धवलगीत म्हणणाऱ्या महिलांना धवलारिन अस म्हंटल जात. शक्यतो या धवलारिन बाया ५०-७० या वयोगटातील म्हाताऱ्या आजीबाया असतात. म्हताऱ्या असतात पण कमालीच्या चपखल, विनोदी अन हजरजबाबी.!  कंबरेतून वाकलेल्या, दातांचा साचा गळलेल्या या डोकऱ्या आयवसा गायला अन नाचायला लागल्या तर २० वर्षाच्या तरुणांना देखील लाजवतील हे मात्र विशेष.!

आगरी समाजातील लग्न कार्यात धवलारिनीला विशेष सन्मान असतो. धवलारिन म्हणजे लग्नसमारंभाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत गाव कारभा-यांच्या जोडीने पारंपारिक पद्धतीने सर्व रीतीरिवाज, प्रथा सांभाळून लग्नकार्य यथायोग्य पार पाडणाऱ्या अनुभवी स्त्रिया. फार पूर्वी देशातील जातीभेद काळात सवर्ण समाजातील पुरोहित आगरी लोकांची लग्नकार्य करीत नसत त्या काळात लग्न कार्याच पौरोहित्य आपल्या सबळ अन अनुभवी खांद्यांवर लिलया पेलून धरणाऱ्या कणखर स्त्रिया म्हणून धवलारिन आगरी समाजाने सन्मानाने स्वीकारली असल्याच अनेक जेष्ठ मंडळीच्या माहितीतून कळत. 
लग्नकार्यात कुटुंबाचे कुलदैवत घरात आणून देव जागे करण्याचे काम भगताचे असते. ते विधी संपन्न केल्यानंतर भगताचे काम संपते परंतु धवले-यांचे काम हळदी पासून लग्न ते अगदी वरात घरी पोहचून लग्न घरी बसवलेले देव पुन्हा हालवून शांत करे पर्यंत चालते. धवलारिन लग्न घरात देवतांच्या जवळचा दिवा सदैव तेवत ठेवून देवदेवतांची अन लग्न कार्यातील वेगवेगळ्या विधींवर आधारित गीते म्हणत असते. लग्न कार्यातिल प्रत्येक विधी आधारित गीत या धवले-यांना अचूक क्रमाने पाठ असतात. हि गीत कुणी लिहली, कुणी रचली, केव्हा कोणाला सुचली, हे निश्चित सांगता येत नाही, मात्र शब्दोल्लेख समजून घेता फार प्राचीन असल्याची दिसून येतात.

ही धवलगीते त्या कशा शिकतात किंवा पाठ करतात हे एक कोडच आहे. धवलेऱ्यांची ही लग्नविधी गीते म्हणजे आगरी समाजाला मिळालेली दैवी देणगी आहे असे मानले जाते. विशिष्ठ चालीत, सुरात हि गीते बोलली जातात. काही ठिकाणी हि गीत फक्त एकटीच धवलारिन म्हणते तर काही ठिकाणी आगोदर एक पद धवलारिन बोलते आणि इतर स्त्रिया तिच्या कोरस(सहगायिका) म्हणून तिच्या मागून त्या पदाचा पुनुरुच्चार करीत हि गीते बोलतात.

आगरी समाजात अशी गीत प्रामुख्याने स्त्रियाच म्हणतात. क्वचित पुरुष देखील अशी गीत बोलताना आढळून येतात परंतु पुरुष शक्यतो बायांची गाणी (देवीचा आजार झालेल्या रुग्णासाठी बोलावयाची गाणी) बोलतात. अशी हि धवलगीते आगरी समाजाचे खास आकर्षण असून लग्न कार्यातील प्रत्येकी विधी-समारंभा नुरूप हि गाणी बोलली जातात. उदा. हळद धवला, काकण बाशिंग धवला, ते लग्न अन वरात पोहचे पर्यंत वेगवेगळी धवलगीत. हि धवलगीते म्हणजे आगरी समाजाचा सांस्कृतिक खजिना आणि धवलारिन म्हणजे त्या खजिन्याची राखणदार कुबेर म्हणणे वावग ठरणार नाही.


भाग - ५

आगरी समाजात लग्न ठरविताना पत्रिका जुळल्या किंवा नवरा-नवरींची पसंती झाली की लग्न पक्के करताना कुंकू लावणीचा विधी करतात. पूर्वी या विधीला साखरखाणे किंवा सुपारी फोडणी असेही म्हणत. अलीकडे साखरपुडा म्हणूनच आमंत्रण केल जात. पूर्वी या विधिमध्ये लग्न पक्के करताना दोन्हीकडील सोयरे मंडळी मिळून दोन दगडांनी एकत्रित पणे एक सुपारी फोडत असत. अलीकडे मात्र फक्त पानाचा विडा किंवा *पेढा* भरवून हा विधी उरकला जातो. अधिक भर म्हणून श्री गणेश पूजन देखील करून घेतल जात.

आगरी समाजात पूर्वी या विधीकरिता नवरा मुलगा येणे बंधन कारक नव्हते. दोन्ही घरातील जेष्ठ मंडळी एकत्र जमून लग्नाची तारीख काढत. मग गावभर लग्नाची साखर वाटली जात असे. काही ठिकाणी लग्न ठरवायला जमलेली मंडळी एकमेकांना कपाळी कुंकू लावत असत. मात्र हल्ली मुलगा-मुलगी यांनी एकमेकांना अंगठी घालण्याची पध्दत प्रचलीत झाली असल्याने साखरपुडा/कुंकू लावणी हा विशेष महत्वाचा विधी वाटू लागला आहे. तरीही नवऱ्या मुलीची खणा नारळाने ओटी भरून तिला भरजरी साडी भेट देण्याची प्रथा अजूनही सुरु आहे. मागील दशकात साखरपुड्याला देखील ट्रक भरून, टपावर बसून प्रवासाला जाणारी माणसे सर्वांच्याच ध्यानात असतील. आमच्या सारख काहींनी अनुभवल देखील असेल.

पूर्वी आगरी समाजात दिवाळी नंतर तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कोणताच लग्नमुहूर्त काढला जात नसे. लग्न ठरताच लग्नघरातून वर/वधू, वरमाय, वाधुमाता, काक्या, मावश्या, आजीसा, भाचे, भाच्या, बहिणी, जावई या अश्या सर्व जवळच्या नातलग मंडळींसाठी लग्नाची वस्त्रे खरेदी केली जातात. त्याला लग्नाचा बस्ता असे म्हणतात. साखरपुडा/कुंकू लावणी झाल्या नंतर निमंत्रण पत्रिका छापल्या जात असत. निमंत्रणाच्या पत्रिका छापून झाल्यावर सर्व घरातल्या देवांना तसेच गावातील ग्रामदेवता, कुलदेवता यांच्या मंदिरात जाउन सर्वप्रथम त्यांना मंगलकार्याला येण्याचे निमंत्रण केले जाते. त्यानंतर मित्रमंडळी व नातेवाईक यांना निमंत्रणपत्रिका वाटल्या जातात व विवाहासाठी निमंत्रित केले जाते. परंतु अलीकडे साखरपुडाहळद-लग्न असे सलग कार्यक्रम घेण्याची रीत देखील रूढ होवू लागली आहे.
आगरी लोकांच्यात 'केळवण/तेलवण हा कार्यक्रमही विशेष महत्वाचा.! केळवण/तेलवण म्हणजे वधू किंवा वराला नातेवाईक आप्तेष्ट मंडळींनी लग्नाआगोदर घरी बोलावून दिलेली मेजवानी. काही ठिकाणी या वेळी वधू किंवा वराला एखादी भेटवस्तू देखील दिली जाते. शक्यतो अशी मेजवानी वधू किंवा वराच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांकडूनच दिली जाते.

आगरी समाजातील लग्न पद्धत विशेष ओळखली जाते ती लग्नापूवीर्वी चालणाऱ्या विधींमुळे. या विधींना सुरुवात होते ती लग्नाच्या आदल्या दिवसापासूनच. लग्न कार्यात मधे भोक पडलेले वडे किंवा घाऱ्या केल्या जातात म्हणून या दिवशी त्यासाठीचे तांदूळ गावच्या पाणवठ्यावर नेवून भिजवून धुवून, मांडवात भरडून त्याचे पीठ वडे किंवा घाऱ्या बनविण्या योग्य बनवले जाते. त्याला चून धुवणे अस म्हणतात. पूर्वी गावा ठिकाणी लग्न कार्यात गावतल्या बायामंडळी गावच्या पाणवठ्यावर धवलागीतांच्या सुरात चून धुवत असत. त्या साठी बांबू वृक्षापासून विणकाम करून बनवलेल्या खास चौकोनी आकाराच्या उभट टोपल्या खरेदी केल्या जात असत. हल्ली घरात नळ आल्याने अशा चून धुवण्याचा प्रकार हळू हळू लुप्त होत आला आहे. आणि लुप्त होवू लागला धवला...(मन्या नवरा बसला मांडव दारी...चून न्ह्या गो पोरी हिरीवरी.. चून न्ह्या गो पोरी गावचे हिरीवरी). अलिबाग मधील काही भागात सकाळी मांडव जेवणाचा कार्यक्रम असतो त्यामुळे तांदळाचे वडे चुनांच्या दिवशी रात्रीपासूनच काढायला सुरुवात होते. तर खारेपाट- पेण विभागात हळदीच्या रात्री घाऱ्या काढल्या जातात.

तसेच या दिवशी कुटुंबाच्या देव्हाऱ्यातील कुलदैवत वाजत-गाजत लग्न घरी आणले जातात. लग्न कार्याची खरी सुरूवात उंबर वृक्षाची फांदी (उंबरमेढ) आणून होते. काही ठिकाणी या विधीला मांडव स्थापना करणे अस देखील म्हणतात. या दिवशीच उंबर आणि आंब्याची फांदी मांडवाच्या खांबाला बांधून श्रीफळ पूजन करून मांडव स्थापना केली जाते. काही ठिकाणी उंबराच्या पाण्याने वधू किंवा वराला अंघोळ घालण्याचा (न्हांदणे) हा विधी त्याच दिवशी उरकला जातो परंतु स्थळपरत्वे ह्या विधीच्या वेळेत आणि पद्धतीत आगरी समाजात देखील थोडाफार फरक आढळून येतो.

त्यानंतर महत्वाचा दिवस म्हणजे हळद. आगरी समाजात प्रत्येक कुटुंबांचा कुलदैवतांचा एक देवारा असतो. आणि कुटुंबाच्या कुलदैवताचे पौरोहित्य करणारा पुरोहित म्हणजेच भगत लग्नघरात सन्मानाने आणलेल्या देवतांना जागे करण्याचा विधी करतो. या वेळी ग्रामदेवताआणि कुलदेवताना नारळलिंबू कोंबडा/बोकडाचा मान देण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी हा विधी पुरुष भगताच्या ऐवजी स्त्री भगत म्हणजेच भग्तीन पार पडते. या पद्धतीत भगताच्या अंगात येण्याला फार महत्व असते (देव खेळवणे). या विधीतून लग्न कार्यात विघ्न येवू नये म्हणून देवतांना आणि पिशाश्चाना शांत करण्यासाठी या भग्तिनीच्या अंगात आलेल्या देवता मार्ग सांगतात असा समज आहे. काही ठिकाणी हा विधी हळदीचे दिवशी सकाळी तर काही ठिकाणी हळदीचे दिवशी रात्री पार पाडला जातो. मात्र देवतांच्या मान-पानाच्या प्रथा जवळ जवळ सारख्याच आहेत. या माना-पानात जरी कोणताही वैदिक शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब नसला तरी भक्ती भाव मात्र ओतप्रोत भरलेला असतो.

भाग - ६

हळदीच्या दिवशी सकाळी गावातील ग्रामस्थ मंडळीनी एकत्र जमून लग्नकार्याकरिता मांडव उभा करून आंब्यांच्या पानांनी मांडव सजविण्याची फार पुरातन प्रथा आगरी समाजात आहे. परंतु अलीकडे रेडीमेड मांडव मिळत असल्याने ग्रामस्थ मांडवकरी फक्त आंब्याची पाने सजवणे, केळी उभ्या करणे इत्यादी कामे उरकून घेतात. अशा वेळी मंडपात सनईचौघडा, टिमकी अशी मंगल वाद्ये वाजविण्याची समस्त हिंदूंचा पुरातन रिवाज आहे. त्यानंतर वधू/वर घरातल्या कुलदैवतांचे दर्शन घेवून ग्रामदेवतांचे दर्शन घेण्याकरिता मांडवाच्या केळींच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडतात. त्यावेळी सोबतच्या स्त्रिया हातात मंगल कलश घेवून असतात. त्यांना करवल्या अस म्हणतात.

लग्न कार्यात यांची लगीनघाई काही न्यारीच असते. ग्रामदेवतांचे दर्शन घेतल्यानंतर हळद लावून घेण्याकरिता वधू/वर पुन्हा कुलदैवतांपाशी बसतात. काही ठिकाणी वर-वधूला रुईच्या तर काही ठिकाणी चाफ्याच्या फुलांपासून बनवलेल्या मुंडावळ्यांनी सजवलं जातं. त्यानंतर लग्नघरी जमलेल्या स्त्रियांकडून वर किंवा वधूच्या अंगाला हळद लावली जाते. उरण, पनवेल विभागात या पद्धतीला नवरा पोकणे असेही म्हणतात. माजघरातील अपुऱ्या जागेमुळे हा विधी शक्यतो घराच्या मांडवात पार पडतो. त्यानंतर वराला लावलेल्या हळदीतील उरलेली हळद (उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वधूकडे जावून तिला हळद लावण्याची प्रथा देखील काही ठिकाणी रूढ आहे.
लग्नात वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगडयात्यावर कोणतेही नक्षीकाम नसते. लग्न कार्यात थाट-माट महत्वाचा होत गेल्यानंतर काही पद्धती नव्याने रूढ होवू लागल्या. चुडा भरण्यासाठी लग्नाच्या मंडपात कासारालाच बोलाविण्याची पध्दत सुरु आहे. वधूचे चुडा भरणे झाल्यावर लग्नघरातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार हिरव्या बांगडया भरण्याची हौस पुरवून घेतात. हा होणारा खर्च मात्र यजमानच करतात. आता चुड्या इतकीच मेहंदीला सुद्धा भरपूर मागणी वाढली आहे. वधू बरोबरीने करवल्या सुद्धा लग्न कार्यात हातभर मेहंदी काढण्याचा चान्स घेतात.

आगरी समाजीक पद्धतीनुसार गावजेवण महत्वाच असल्याने सकाळी मांडव सजविण्यास आलेल्या ग्रामस्थ मंडळींपासून ते रात्री मांडव नाचवायला येणाऱ्या मित्र मंडळीपर्यंत सर्वांसाठी दिवसभर लग्नघरी जेवणाचा कार्यक्रम सुरूच राहतो. पूर्वी हे गावजेवण गावातील स्त्रिया भरपहाटे लवकर उठून मांडवदारी जमून एकत्रितपणे चुल्ह्यावर शिजवत असत. आगरी समाजाच वैशीष्ट सांगणारे तांदळाचे वडे काढण्यासाठी या जमलेल्या बायामंडळी तवा/कढई ठेवलेल्या चुल्ह्या सभोवताली गोलाकार रिंगणात बसून धवलगीत म्हणत बांबू वृक्षाच्या पातळ-लांब काठ्यांनी वडे तळून कढई बाहेर काढत.    

जेवणासह पापडतांदळाच्या फेण्यामधोमध भोक पाडलेले तांदळाचे वडे, असे पदार्थ बनविणाऱ्या स्त्रिया हि धवलगीते सामूहिकरीत्या बोलत असत. त्यांच्या धवलगीतांच्या सुरांनीच गावाची सकाळ होत असे. या अशा पद्धतीने गाणी बोलत काम करण्याचा आनंद काही औरच असल्याचे डोकऱ्या आजी मंडळी अनुभवातून सांगतात. अलीकडच्या काळातही कित्येक गावांमध्ये हि पद्धती अजूनही रूढ आहे. काही ठिकाणी मात्र केटरर्स पाचारण करावे लागतात तो भाग वेगळा.!

त्याच प्रमाणे या दिवशी घाणा भरणी नावाचा विधी असतो. लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला घाणा भरणे असे म्हंटले जाते. आंब्याची पान, हार-फुलेतसेच हळदीत बुडविलेल्या चिंधीने मुसळ सुशोभित केले जाते. मुसळ रोवळी दगडी पाटा कढई यांची पूजा करून पाच सुवासिनी व वधू/वर यांचे मातापिता मिळून उखळात तांदूळगहूतीळ, उडीद अशाप्रकारचे धान्य घालून भरडतात. हे भरडलेल धान्य जात्यावर दळून वडयांच्या पिठात घालण्याची पध्दत आहे. या प्रत्येक वेगवेगळ्या विधीच्या वेळी धवला गाणाऱ्या धवलारनीच्या गीतांचा पाढा मात्र सतत सुरूच असतो.

अलिबाग तालुक्यात हळदीच्या सायंकाळी वर/वधूचे माता-पिता अन विधवा आजी असे मिळून गावात भिक्षा मागण्याची प्रथा आहे. यावेळी वर/वधू माता आणि आजी केस मोकळे ठेवून तोंडात गवताची काडी घेवून उभी राहते. मात्र वर/वधू मातेच्या डोक्यावर फाटकी वहाण(चप्पल) आणि आजीच्या डोक्यावर जळक्या गोवरीच गाडग घेतलेलं असत. वर/वधू पिता गळ्यात झोळी अडकवून गावात किमान ५ घरातून भिक्षा मागून आणलेल धान्य लग्नाच्या वऱ्हाडाला द्यावयाच्या जेवणात मिसळवतो. यजमान हा कफल्लक भिक्षेकरू असून त्यान वऱ्हाडाला घातलेलं गावजेवण हे भिक्षेतून आणून घातल आहे असा त्याचा अर्थ सांगितला जातो. तसेच आगरी समाजाच्या श्रद्धेप्रमाणे अग्नी सभोवती ओंजळीने धान्य सोडून पूर्वजांना मान दिला जातो.

त्यानंतर खरी धम्माल सुरु होते ती रात्रीच्या मांडव नाचवीण्याच्या वेळी. लग्नघरी जमलेले सर्व नातलग, आप्तेष्ट, मित्र मंडळी आनंद व्यक्त करताना एकत्रितपणे जल्लोषात मांडवात नाचतात. मात्र हि प्रथा नसून अलीकडे रात्रीच्या वेळी मटणाचे जेवण, मद्य वाटप, बेंजो आणि डीजे या सारख्या गोष्टीवर वारेमाप होणारा खर्च यातून निर्माण झालेली पद्धत आहे. पूर्वीच्या काळात रात्रीच्या वेळी आगरी समाजातील लग्नघरी पेट्रोम्याक्सच्या उजेडात (बत्ती) दिवसभर लग्नकार्यातील कामे करून दमलेली मंडळी लोकगीत म्हणून सामुहिक लोकनृत्य करून आनंद व्यक्त करीत असत. परंतु अलीकडच्या वेगवान बदलत्या युगात आगरी समाज आपली लोकगीत आणि लोकनृत्य विसरत पाश्चात्यांच्या अंधानुकरणात गुरफटू गेला आहे.


भाग - ७

त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे लग्नाचा दिवस. या दिवशी लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेनुसार नवरा मुलगा मांडवात दाढी करण्यासाठी बसतो. दाढी करण्याचा मान मात्र सर्व गावातून कोणत्यातरी एकाच न्हाव्याला दिलेला असतो. या विधीला नवऱ्याच मव करणे अस म्हणतात. त्यानंतर सकाळी वधू/वर मांडवात पाटावर बसते आणि तिच्या/त्याच्या चारही बाजूंना माठ/मडकी/कळस ठेवलेले असतात. त्यात आंघोळीसाठी उंबरमेढी जवळच पुजलेल पाणी भरलेलं असतं. वर/वधूच्या आई,बहिणी त्यांच्या मागोमाग अंघोळीसाठी बसतात. न्हांदण्यासाठी बसलेल्या स्त्रियांच्या केसांना नारळाचं दूध लावण्याची पद्धत आहे.  त्यानंतर जमलेल्या स्त्रिया धवलारनीच्या सुरात सूर मिसळून वर/वधू आणि आणि त्यांच्या मागे बसलेल्या स्त्रियांना आंघोळ घालतात. या प्रथेला न्हांदणे अस म्हणतात. मी यापूर्वीच सांगितल्या प्रमाणे स्थळपरत्वे प्रत्येक विधीच्या वेळेत आणि पद्धतीत आगरी समाजात देखील थोडाफार फरक आढळून येतो. काही ठिकाणी हा विधी वर/वधूला हळद लावण्यापूर्वी केला जातो.

या न्हांदण्याच्या विधीनंतर लग्नाआधी काकण बाशिंग नावाचा महत्वाचा विधी असतो. वर/वधूला कुलदैवतासमक्ष बसवून तिच्या डोक्यावर चौकोनी आकाराचं कापड धरलं जातं. त्यात सोन्याचा एक दागिना झेंडूच्या पाकळ्या तांदूळ फेण्या ठेवून चारही बाजूंनी ते कापड हलवतात. धवलारीण या प्रसंगाला विशेष धवला म्हणते. त्यानंतर वर/वधूचा मामा वर/वधूला मांडीवर बसवून वर/वधूच्या हाताला काकण बांधतो. आगरी प्रथेनुसार लग्नाकरिता वर/वधूच्या वस्त्र अन बाशिंग यांचा खर्च मामा कडून असतो. त्यानुसार मामा भाचा/भाचीला सदर वस्त्र अन बाशिंग देतो. मव झाल्यानंतर नवरा मांडवात आंघोळ करून मांडवातच लग्नाची वस्त्रे परिधान करतो.

लग्नाची वस्त्रे परिधान करून बाशिंग बांधून सजलेला नवरदेव घरातील कुलदैवत, आई वडील, अन वडीलधारी मंडळी यांचा आशीर्वाद घेतो. त्यावेळी नवरदेवाला दुधाचा पेला पाजण्याची प्रथा आजही आगरी समाजात रूढ आहे. त्यानंतर नवरदेव घोड्यावरून किंवा रथातून ग्रामदैवताच दर्शन घेवून वाद्यांच्या गर्जनेत दिमाखात मंगलछत्र घेवून वधूच्या मांडवाकडे प्रयाण करतो. समोर चालणारी सोबतची करवली नवऱ्याच्या मार्गात सतत धान्याचे चार-दोन दाने टाकत राहते त्याला रंगावल म्हणतात.

वधूच्या घराच्या मांडवात किंवा लग्न मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाला काही अंतरावर थांबवल जात. तेथून वराकडील करवल्या वधूला उंची साडी, गजरा व दागिने इत्यादी मानपान पोहचता करतात. व वधूकडील करवल्या नवरदेवाला फराळ,घेऊन त्याच औक्षण करण्यासाठी जातात. त्याला रुखवत अस म्हणतात. (प्रत्यक्षात या प्रथेला कोणताही पुरातन जोड असल्याच दिसून येत नाही) परंतु कदाचित मुहूर्त घटका भरण्याच्या वेळेपर्यंत लग्नमंडपात वेळेची मुभा मिळवण्यासाठी अलीकडच्या काळात हि नवीन क्लुप्ती शोधून काढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यानंतर मुहूर्त घटका भरत आल्यानंतर नवरदेवाला मंडपात आणले जाते. तत्पूर्वी काही ठिकाणी मंडपाच्या दारात वधूचे माता पिता नवरदेव तसेच त्या घरचे जुने जावई यांना एकत्रित पाटावर उभे करून त्याचं औक्षण करतात. तर काही ठिकाणी नवरदेवाने चोरवाटेने येवून मुलगी नेण्याची प्रथा असल्याने नवरदेवाला घराच्या मागल्या बाजूने लग्न मंडपात नेण्यात येते. त्या वेळी वधूचा भाऊ नवरदेवाचा कान पिळून 'माझ्या बहिणीची नीट काळजी घेअसे नवरदेवाला बजावतो. याला 'कानपिळी' म्हणतात.

लग्नमंडपात यजमान नवरदेवाचा हात धरून त्याला पाटावर पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा करतात. त्याच्या समक्ष अंतरपाट धरला जातो. त्यानंतर वधूचा मामा वधूला खांद्यावर उचलून घेवून लग्न मंडपात नवरदेवाच्या सन्मुख पाटावर पूर्व दिशेकडे तोंड करून उभी करतो. सामाजिक प्रबोधन आणि जातिभेदातील जवळपास नष्ट होत आलेले अंतर यामुळे पुरोहित आगरी समाजातील लग्न लावून देतात. पुरोहितांच्या वेद मंत्रांच्या, मंगलाष्टकांच्या उच्चारात अक्षतांच्या वर्षावात लग्न सोहळा यथायोग्य संपन्न होतो. लग्न लागे पर्यंत मंगलछत्र मात्र उघडच ठेवण्याची रीत आहे.


आगरी समाजात बऱ्याच ठिकाणी वधूचीआई मंगलाष्टकं ऐकत नाही. तर काही ठिकाणी वराची आई मंगलाष्टकं सुरु असताना मंडपाच्या दारात मंडपाकडे पाठ करून उभी राहते. (माझ लाडक बाळ आता सूनेन माझ्या पासून हिरावून घेतल म्हणून रुसून बसलेली वरमाय असा त्याचा अर्थ काही डोकऱ्या आयव सांगतात) काही ठिकाणी वधूमाता आणि वरमाय अंतरपाटाजवळ पाठीला पाठ लावून हात जोडून उभ्या राहतात आणि शेवटच्या दोन-तीन मंगलाष्टकांमध्ये एकमेकींच तोंड पाहतात.

त्यानंतर अलीकडच्या काळातील पुरोहितांच्या उपस्थितीमुळे शास्त्रोक्त पद्धतीने होम, अग्निप्रदक्षिणा, सप्तपदी, कन्यादान इत्यादी कार्ये पार पडली जाऊ लागली आहेत. तत्पूर्वीच्या काळात धवलारीनीच्या सुचनाप्रमाणे नव विवाहित वर आणि वधू कुलदैवताचे समक्ष बसून अग्नीला ओंजळ भरून लाह्या अर्पण करीत असत. त्याच अग्नीवर नव विवाहित वर आणि वधूच्या हातांवर वधूचे मातापिता आपल्या हाताने ओंजळभर पाणी सोडून कन्यादानाचे पवित्र पुण्य प्राप्त करीत असत. कन्यादानाच्यावेळी वधूचे मातापिता सर्वांच्या साक्षीने आमची मुलगी तुमच्या घरात दिलेली आहे तिची जबाबदारी आता तुमची आहे असे नव्या जावयांना सांगतात. 

यानंतर नववधू तिच्या पतीसह तिच्या सासरी जाण्यास निघते. हा प्रसंग अतिशय भावनाशील व काळजाला भिडणारा असतो. जन्म देऊन लाडाकोडाने वाढविलेली लाडकी लेक आपल्याला कायमची सोडून सासरी निघून जाणार या कल्पनेने वधूच्या माता-पित्यांसह समस्त वधुपक्षाचा कंठ दाटून येतो. नयन अश्रूधाराना वाट मोकळी करून देतात. वधू देखील साश्रुनयनांनी सर्वांचा निरोप घेऊन पतीगृही जाण्यास निघते. जाण्याआधी माहेरहून वधूची ओटी भरून, वर आणि वधूला दुधाचा पेला पाजून तिची आनंदाने पाठवणी केली जाते.

वरपक्षाकडे मात्र घरात लक्ष्मीप्रवेश होणार म्हणून आनंदी वातावरण असते. वर-वधूचे वराच्या गावात जल्लोषात स्वागत करण्यासाठी वाजत गाजत वरात काढली जाते. पूर्वी लग्नाच वऱ्हाड बैलगाडीतून जात असे. मातीच्या कच्च्या गाडरस्त्याने बैल गाड्यांची लांबच लांब रांग लग्न कार्याला निघत असे. काही निवडक माणसे वरातीच्या सोबतच्या लवाजम्यात डोक्यावर पेट्रोम्याक्स घेवून उजेड दाखवीत चालत असत. सायंकाळच्या काळोखात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ आवाज, बैलगाडीच्या जोखडापुढ टांगलेल लहानस कंदील, गाडीखाली चपळतेने चालणार घरातल पाळीव कुत्र, बैलगाडीत बसलेल्या बाया मंडळींच्या गीतांनी रात्रीच्या शांततेला पाडलेल सुरमयी भगदाड, हे सार चित्र आता स्वप्नवत वाटू लागल आहे. बदलत्या काळानुरूप ट्रक अन आता बस असा बदल होत गेला. धवलगीते गाणाऱ्या महिला दिसेनाश्या झाल्या.

वरात घरी पोहचल्या नंतर मंडपाच्या दारात नववधूच औक्षण करून तिचा लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश होतो. धवलारनीच्या सुरात दोघा नव दांपत्यांचे हस्ते कुलदेवतांची पूजा होते. त्यानंतर नवरदेवाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेनुसार घरात श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न होते. दुसऱ्या दिवशी कुलदैवतांचा गोंधळ घालून त्यांना कोंबडा,बकऱ्याचा मानपान दिला जातो. त्यानंतर समस्त नातलग आप्तेष्ट मिळून मांसाहार भोजन करून लग्न कार्याची सांगता करतात.

या संपूर्ण प्रथा परंपरेत वारेमाप खर्च होत असल्याने आता आगरी लग्न पद्धती देखील कात टाकू लागली आहे. समाज प्रबोधन आणि शिक्षणामुळे लग्नातील काही सोहळे, विधी यांना बगल देवून साध्या पद्धतीने लग्न समारंभ उरकण्याकडे आता आगरी समाज हळू हळू झुकू लागला आहे. परंतु त्याच जोडीने आगरी समाजातील सांस्कृतिक खजिना असलेल लोकसंगीत, लोकनृत्य काळाच्या ओघात लुप्त होण्याची भीती मात्र निर्माण होवू लागलेली आहे. लोकसंगीत, लोकनृत्य, धवलगीतांचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीसाठी राखून ठेवणे गरजेच असताना बदलत्या युगानुसार बदलती तरुणाई आपल्या सांस्कृतिक परंपरे पासून दूर होत चालली आहे हेच या आगरी समाजाच दुर्दैव म्हणाव लागेल.!

“शहरीकरणाबरोबरीने काळाच्या पडद्या मागे हरपत गेलेली आगरी विवाह सोहळा पद्धतीची माझ्या कुवतीनुसार मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या पिढीने विवाह सोहळ्यात अनुभवलेले आनंदाचे क्षण कदाचित आमच्या पुढील पिढीला अनुभवणे शक्य नसेल म्हणूनच हा खटाटोप.! या सदरच्या लेखात स्थळानुरूप येणाऱ्या फरकाने काही प्रथां मांडणीत फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी बदलाची गरज भासल्यास अत्यावश्यक बदल करण्याची तजवीज ठेवली आहे”. 

(संग्रह आईच्या आठवणी अन मौखिक, लिखित, संकलित माहिती)

मन्या ठाकूर  

1 comment:

  1. पाच परतावन हा कार्यक्रम आगरी समाजात केला जातो का? हळद उतरवणी चा कार्यक्रम कुठे आणि कसा पार पाडतो याची देखील माहिती मिळू शकते का ?

    ReplyDelete